मोठी बातमी : अखेर दादांनी घेतला निर्णय : महायुतीला दिला पाठींबा !

लोकसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरु असतांना मतदानाला दोन दिवस शिल्लक असतांना ठाकरे गटाचे नेते व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी ठाकरेंच्या सर्वच पदांचे राजीनामे दिले होते. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ माजली होती. त्यानंतर दि.१० रोजी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी जळगावात आगमन करीत आज दि.११ रोजी भाजपसह महायुतीच्या उमेदवारांना पाठींबा दिल्याने आज पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेला उधान आले आहे. यावेळी मंत्री गिरीश महाजन, आ.राजूमामा भोळे, महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्यासह पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र माजी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील देखील उपस्थित होते. यावेळी दादांनी एक पत्र देत महायुतीला भक्कम पाठींबा दिला आहे.

काय आहे दादांच्या पत्रात
प्रिय जळगाव जिल्हावासियांनो,
खान्देश माझी जन्मभूमी व जळगाव माझी कर्मभूमि राहिलेली आहे. सर्व जळगावकरांना मी माझ्या परिवाराचा सदस्य म्हणून मानतो. मी नेहमी जळगावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहिलो आहे. विकासाशिवाय पर्याय नाही. मग तो भारतदेशाचा, राज्याचा, जिल्ह्याचा किवा जळगावचा असो. विकासामुळे देशात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रगतीच्या कक्षा रुंदावतात त्यात शिक्षण, आरोग्य, कृषी, पायाभूत सुविधा (रेल्वे, रस्ते, विमान सेवा, पिण्याचे पाणी, घरकुल इ.), याच कडीत भारत देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी उद्योगाची साखळी निर्माण करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात अशा अनेक गोष्टीमुळे सकारात्मक बदल घडून भारत जगाच्या पाठीवर एक वेगळे स्थान निर्माण करेल ही शाश्वती आहे.
मी १९७८-१९८० ला राजकारणात आल्यावर विकासाच व्हिजीन ठेवून जळगावला स्वच्छ सुंदर-साक्षर व हिरवेगार शहर बनवायचे ध्येय ठेवले होते व तसे कार्य ही केले त्यामुळे जळगाव शहराच्या विकासासोबत जिल्ह्याच्या, राज्याच्या व देशाच्याही विकासाला हातभार लावता आला.
मी २०१४ पासून राजकारणात सक्रीय नाही. वयोमानानुसार आणि तब्येतीच्या दृष्टीने आता राजकीय रणांगणात उतरायची इच्छा ही नाही. पण समाजकारण माझ्या रक्तातच आहे. गेल्या ४५ वर्षाचा विकासाचा आणि त्यासाठी केलेल्या कामांचा अनुभव माझ्या पाठीशी आहे. राजकीय जीवनात विकासासाठीच मी वेगवेगळ्या पक्षामध्ये राहिलो आणि आपण मला भरभरून आशिर्वादही दिले. नवीन विकसीत भारतात जळगाव जिल्ह्याला मानाचे स्थान मिळावे म्हणूनच या पुढे मार्गदर्शकाच्या भूमिकेत जळगाव शहर, जिल्हा, राज्य व देशाच्या विकासात हातभार लावण्यासाठी मी नेहमीच कटीबद्ध राहील. तोच धागा पकडून ज्या पक्षात विकासाचं व्हिजन आहे, नियोजन आहे, आणि त्यापक्षाचे नेतृत्व विकसीत भारताचे व्हिजन ठेवून कार्य करीत असेल, अशा पक्षाला आणि नेतृत्वाला माझा नेहमीच पाठिबा राहील.
सन्माननीय मोदीजीच्या स्वप्नातील विकसीत भारत घडावा व मी पाहिलेले विकसीत जळगाव जिल्हायाचे स्वप्न पूर्ण व करण्याच्या दृष्टीने त्यांच्या नेतृत्वाला पर्यायाने भारतीय जनता पक्षाला पक्षाला महायुतीला मी जाहीर समर्थन देत आहे. माझ्या राजकीय आयुष्यात तुम्ही आजावर जे प्रेम दिलं त्या प्रेमाला मी कायम उतराही होण्याचा प्रयत्न करेल. पक्ष, धर्म, जात-पात या पलीकडे आपण सर्व कायम माझ्या सोबत राहिलात. माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व जळगाव जिल्हावासियांना माझी आग्रहाची विनंती आपण आपल्या जळगाव जिल्हाच्या विकासासाठी आपले बहुमुल्य मत जळगाव मतदार संघाच्या उमेदवार स्मिताताई वाघ व रावेर मतदार संघाच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांच्या कमळ या चिन्हाला देऊन सन्माननीय मोदीजीचे विकसीत भारत घडविण्यासाठी हात बळकट करुया.
असा आशयाचे पत्र सध्या जळगाव जिल्ह्यातील सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.