जळगाव विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाला मार्ग – शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई, दि. १० फेब्रुवारी २०२५ : जळगाव विमानतळाच्या विस्तारीकरणास मोठी गती मिळाली असून, विमानतळाच्या धावपट्टीच्या पूर्ण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सदर धावपट्टीच्या संरेखानामधून जाणारा नशीरबाद ते उमाळे (प्र.जि.मा. १८) हा रस्ता बंद करून पर्यायी मार्गाचा विकास करण्यासाठी एकूण ₹६६०.७० लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे.
धावपट्टी विस्तारीकरणासाठी आवश्यक उपाययोजना
जळगाव विमानतळाच्या धावपट्टीच्या पूर्व भागात विस्तारासाठी भूसंपादन करण्यात आले असून, त्याच्या संरेखानामधून हा रस्ता जात असल्याने विमानतळाचा संपूर्ण विकास अद्याप पूर्ण होऊ शकलेला नव्हता. त्यामुळे सद्यःस्थितीत वापरात असलेला नशीरबाद ते उमाळे हा रस्ता बंद करून प्रमुख जिल्हा मार्ग १०९ च्या साखळी क्र. १३/००० ते १८/००० दरम्यान रुंदीकरण व मजबुतीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, चिंचोली ते नशीरबाद-उमाळे रस्त्यापर्यंत वाहिवाट रस्ता आणि वाहिवाट रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधण्याचीही योजना आहे.
शासनाच्या शक्ती प्रदत्त समितीची मान्यता
या कामासाठी आवश्यक असलेल्या निधीसाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने शासनास प्रस्ताव सादर केला होता. दि. १४ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या शक्ती प्रदत्त समितीच्या बैठकीत या प्रस्तावास मान्यता देण्यात आली, आणि त्यानुसार शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
कामांच्या तपशीलवार अंदाजित खर्च सदर विस्तारीकरणासाठी खालीलप्रमाणे निधी मंजूर करण्यात आला आहे :
निधी संकलन आणि खर्च हा निधी “मागणी क्रमांक ए-७, ३०५३ नागरी विमानचालन” अंतर्गत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस सहायक अनुदान स्वरूपात उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासाठी विमानचालन संचालनालय, मुंबईचे उपसंचालक आहरण व संवितरण अधिकारी म्हणून कार्यरत राहणार आहेत.
परिणाम आणि भविष्यातील प्रभाव
या निर्णयामुळे जळगाव विमानतळाचा विस्तार वेगाने होणार असून, भविष्यात अधिक मोठ्या विमानांचे लँडिंग आणि टेक-ऑफ सुलभ होणार आहे. यामुळे जळगाव आणि परिसरातील आर्थिक विकासाला चालना मिळेल तसेच व्यापार, पर्यटन आणि उद्योगांना मोठा फायदा होईल.