जळगावमध्ये अतिक्रमण कारवाईचा विस्फोट! मनपा कर्मचाऱ्यांनी विक्रेत्याला मारहाण?

जळगाव शहरातील पांजरापोळ परिसरात घडली असून, अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईदरम्यान महापालिका अतिक्रमण विभागाच्या पथक व स्थानिक विक्रेत्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे कर्मचारी कारवाईसाठी पांजरापोळ भागात गेले होते. त्यावेळी स्थानिक विक्रेते आपल्या हातगाड्या व विक्रीसाठी लागणारे साहित्य रस्त्याच्या कडेला लावत होते. याच दरम्यान महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे साहित्य बाजूला करत कारवाई सुरू केली. यावरूनच विक्रेते आणि मनपा कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला.
वाद एवढा वाढला की विक्रेते असलेल्या पिता-पुत्रांनी महापालिका कर्मचाऱ्यांवर मारहाणीचा आरोप केला. त्यांनी दावा केला की, मनपा कर्मचाऱ्यांनी त्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ करत जबरदस्तीने साहित्य उचलून फेकले. या प्रकारामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती शनिपेठ पोलीस ठाण्यात पोहोचताच, दोन्ही गट पोलीस ठाण्यात दाखल झाले. परंतु तिथेही वाद शमला नाही. विक्रेत्यांच्या समर्थनार्थ आलेल्या काही तरुणांमध्ये व मनपा कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा बाचाबाची झाली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र तक्रार नोंदवली गेली नाही, असा आरोप विक्रेत्यांनी केला आहे.
त्यानंतर पीडित विक्रेते शनिपेठ पोलीस ठाण्याहून थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी आपली तक्रार सादर केली. पोलिस अधीक्षकांनी तक्रार अर्ज स्वीकारला असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन पीडित विक्रेत्यांना दिले आहे.
या प्रकरणामुळे महापालिका अतिक्रमण कारवाईवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून स्थानिक पातळीवर संतापाची लाट पसरली आहे. प्रशासन आणि विक्रेते यांच्यातील तणावावर समन्वयातून तोडगा काढण्याची मागणी आता पुढे येत आहे.