रामदेववाडी कार अपघातातील संशयित यांना 27 मे पर्यंत पोलिस कोठडी

रामदेववाडी कार अपघात प्रकरणातील संशयित अर्णव अभिषेक कौल व अखिलेश संजय पवार यांना पोलिसांनी अटक करुन शुक्रवारी (ता.24) न्यायाधीश वसीम देशमुख यांच्या न्यायालयात हजर केले. तपासाधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी यावेळी इतर आरोपींना पकडणे, गाडीत आणखी गांजा होता का? याचा शोध घेणे, घटनास्थळी दुसरी कार का आली होती, दोन्ही वाहनात शर्यत सुरु होती का? याचा तपास करण्याकामी 14 दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. प्रत्यक्षात न्यायालयाने दोघांना 27 मे पर्यंतच पोलिस कोठडी सुनावली.
सरकार पक्षातर्फे ॲड.स्वाती निकम यांनी कलम 304 ची बाजू मांडत संशयित सज्ञान असून भरधाव वाहन चालवण्याने अपघात होऊ शकतो, याची त्यांना माहिती होती. वाहनात गांजा मिळून आला असून गांजा बाळगणे देखील गुन्हा आहे. तसेच पोलीस रिमांडमधील मुद्द्यांचा विचार करता पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. र्णव कौल याच्यातर्फे बाजू मांडताना ॲड. प्रकाश बी. पाटील यांनी बाजू मांडली, तर अखिलेश पवार याच्यातर्फे अखिलेश पवार याच्यातर्फे ॲड.सागर चित्रे यांनी बाजू मांडली.
तपासाधिकारी संदीप गावीत म्हणाले की, संशयित अखिलेश पवार याने जबाबात वाहन अर्णव कौल हा चालवित असल्याचे सांगितले आहे. वळण रस्त्यावर वाहनाचा वेग 30 किमी मर्यादेत हवा असताना तो नियंत्रणात नव्हता. त्यावर ॲड.अकील इस्माईल यांनी अर्णव वाहन चालवत असल्याचा रिमांड रिपोर्टमध्ये स्पष्ट उल्लेख नाही. तसेच जर अर्णव हा वाहन चालवत होता तर अखिलेश याचा संबंधच येत नसल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद आणि तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर न्यायालयाने दोघांना 27 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.