बातम्या

जळगाव जिल्ह्याला मिळणार केंद्रीय मंत्रीपद!

महा पोलीस न्यूज | चेतन वाणी |लोकसभा निवडणुकीत राज्यभरात महायुतीविरुद्ध वातावरण पाहण्यास मिळाले असताना देखील उत्तर महाराष्ट्रात महायुतीने आपला गड कायम राखला आहे. जळगाव आणि रावेर मतदार संघातून भाजपचे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले आहेत. खा.रक्षा खडसे यांनी हॅटट्रिक केल्याने तर मराठा महिला चेहरा म्हणून केंद्रीय मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. दोन्ही खासदार दिल्ली रवाना झाल्या असून कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप-महायुतीच्या जागा कमी झाल्या आहेत. महाराष्ट्रात देखील महायुतीला मोठा फटका बसला आहे. भाजपला राज्यात फटका बसला असला तरी जळगाव जिल्ह्यात भाजपने आपला गड कायम राखला आहे. उत्तर महाराष्ट्रात भाजप-महायुतीच्या ८ पैकी केवळ २ जागा जळगावात निवडून आल्या आहेत. जळगाव लोकसभा मतदार संघातून स्मिता वाघ आणि रावेर लोकसभा मतदार संघातून रक्षा खडसे मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्या आहेत.

उत्तर महाराष्ट्राला दोनदा संधी
गेल्या पंचवार्षिकमध्ये भाजप सरकारने दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ.भारती पवार यांना केंद्रीय राज्यमंत्री पद दिले होते. तत्पूर्वी २०१४ च्या निवडणुकीनंतर धुळे लोकसभा मतदार संघाचे खा.डॉ.सुभाष भामरे यांना देखील केंद्राने मंत्रीपद दिले होते. काँग्रेस सरकारच्या काळात नव्हे तर भाजप सरकारच्या काळात उत्तर महाराष्ट्राला संधी मिळाली असे बोलले जात होते. नाशिक आणि धुळेनंतर जळगावचा नंबर लागेल असे बोलले जात आहे.

..म्हणून जळगावची लागेल वर्णी
नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खा.डॉ.भारती पवार आणि धुळे लोकसभा मतदार संघाचे खा.डॉ.सुभाष भामरे यांचा पराभव झाला आहे. उत्तर महाराष्ट्रातील दोन्ही आजी-माजी मंत्री पराभूत झाल्याने जळगावच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. रावेरच्या खा.रक्षा खडसे यांनी सलग तिसऱ्यांदा बाजी मारली आहे तर जळगावातून उमेदवारी बदलल्यावर देखील स्मिता वाघ यांनी गड राखला आहे. उत्तर महाराष्ट्रात भाजपचा गड राखल्याने जळगावला संधी मिळण्याची शक्यता आहे.

कुणाच्या गळ्यात पडणार माळ?
जळगाव जिल्ह्यातील जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या सून रक्षा खडसे सलग तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्या आहेत. त्यातच एकनाथराव खडसे देखील पुन्हा भाजपच्या वाटेवर आहेत. दुसरीकडे राज्यात आणि देशात विनोद तावडे यांचे वाढते महत्व देखील खडसेंना अनुकूल आहे. जळगावच्या नवनिर्वाचित खा.स्मिता वाघ या अभाविपपासून पक्षाशी एकनिष्ठ असून मराठा महिला खासदार म्हणून पुढे आल्या आहेत. दोघांचे केंद्रातील नेत्यांशी चांगले संबंध असल्याने कुणी एकाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची दाट शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!