बातम्या

“यावल नगरपरिषदेची स्वच्छतेकडे पाठ – शहरात घाणीचे साम्राज्य!”

  1. यावल: महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यात स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबविण्याचे आदेश दिले असून, आमदार अमोलदादा जावळे यांनी देखील यावल नगरपरिषदेला स्वच्छता मोहिमेसाठी स्पष्ट सूचना दिल्या आहेत. मात्र, यावल नगरपरिषद प्रशासन या आदेशांकडे आणि सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. शहरातील अनेक भागांत कचऱ्याचे ढीग, गटारीतील साचलेले पाणी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य बघायला मिळत आहे.

शहरात अनेक ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य

यावल नगरपरिषद मुख्यालयापासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या यावल पोस्ट ऑफिससमोर, तिरुपतीनगरमधील खाजगी मोकळ्या जागांवर, पंचायत समिती कार्यालयाच्या मागील बाजूस आणि इतर अनेक विकसित भागांत साफसफाईची दयनीय अवस्था आहे. गटारींमध्ये साचलेले घाण पाणी वाहून न गेल्याने दुर्गंधी पसरत आहे. शहरातील अनेक भागांत नियमित झाडू मारली जात नाही, त्यामुळे गल्लीबोळात घाणीचे साम्राज्य आणि काटेरी झाडे-जुडपे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

साने गुरुजी विद्यालयाच्या आवारातही अस्वच्छता यावल नगरपरिषद संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या संरक्षक भिंतीलगत व पटांगणावर मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे आणि कचरा साचलेला आहे. विशेषतः विद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील मोकळ्या जागेत काही नागरिक प्रातःविधीसाठी जात असल्याने मोठी अस्वच्छता निर्माण झाली आहे. यामुळे परीक्षा देणारे विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी वर्ग दुर्गंधीने त्रस्त झाले आहेत. आरोग्याच्या दृष्टीने ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून, साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

गुड मॉर्निंग पथक कुठे आहे?

शहरात अस्वच्छता रोखण्यासाठी आणि नागरिकांना सकाळी खुले शौच टाळण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले गुड मॉर्निंग पथक अदृश्य झाले आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता वाढत असून, स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

यावल नगरपरिषद स्वच्छ भारत अभियानाच्या आदेशांना गांभीर्याने घेत नाही का? असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. शहरात स्वच्छतेच्या अभावामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, संपूर्ण यावल शहरात संतापाची लाट उसळली आहे.

आमदार अमोलदादा जावळे नगरपरिषदेची हकीकत जाणून घेणार?

नगरपरिषदेच्या या दुर्लक्षावर आता आमदार अमोलदादा जावळे स्वतः लक्ष घालणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांनी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना प्रत्यक्ष घटनास्थळी नेऊन पाहणी केल्यास नगरपरिषदेच्या स्वच्छतेच्या “चमकोगिरीचा” पर्दाफाश होईल.

नगरपरिषदेने त्वरित कारवाई करावी!

यावल शहरातील अस्वच्छता आणि वाढती आरोग्य धोक्याची परिस्थिती लक्षात घेता, नगरपरिषदेने त्वरित स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. आता पाहावे लागेल की, यावल नगरपरिषद या गंभीर समस्येवर त्वरित उपाययोजना करते की नाही!

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!