“महिलांनी पर्समध्ये लाली नाही, चाकू आणि मिरची ठेवली पाहिजे!” – मंत्री गुलाबराव पाटील यांचे परखड मत

जळगाव: महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना पाहता महिलांनी आता अधिक सावध होण्याची गरज आहे. “महिलांनी आपल्या पर्समध्ये लाली-पावडर ठेवण्यापेक्षा मिरची पूड आणि चाकू ठेवावा” असे आवाहन वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी पूर्वी केले होते. त्यावेळी विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती, मात्र आजच्या परिस्थितीत बाळासाहेबांचे तेच शब्द खरी ठरत आहेत, असे मत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.
जळगाव येथे महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना पाटील म्हणाले, “आज महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे महिलांनी आता वाघीण बनले पाहिजे. त्यांना सबला होण्याची गरज आहे. आत्महत्या करण्याऐवजी त्यांनी टोकाची भूमिका न घेता उपाय शोधावेत.”
त्याचबरोबर, आज मॉल संस्कृती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे महिला बचत गटांसाठी महानगरपालिकेने मॉलची व्यवस्था करावी तसेच पालिकेने उभारलेल्या गाळ्यांपैकी पाच टक्के गाळे महिला बचत गटांना द्यावेत, अशी सूचनाही त्यांनी केली.
महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर
गेल्या काही वर्षांत महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर महिलांनी आपली सुरक्षितता स्वतःच सांभाळावी, असे स्पष्टपणे सांगताना पाटील यांनी महिलांना सक्षम होण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला आमदार सुरेश भोळे, आयुक्त , उपायुक्त यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. “आमच्या विजयामध्ये महिला मतदारांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे मामा आणि भाऊ म्हणून आम्ही महिलांसाठी शंभर टक्के जबाबदारी पार पाडू,” असे आश्वासनही पाटील यांनी दिले.