बातम्या

जळगाव शहरात सिग्नल सुरू, पण वाहनधारक शिस्त हरवलेलीच!

जळगाव शहरातील प्रमुख चौकांमध्ये – टॉवर चौक, कोर्ट चौक, स्वातंत्र्य चौक, आकाशवाणी चौक आणि अजिंठा चौक – येथे वाहतुकीची शिस्त राखण्यासाठी नव्याने सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. प्रशासनाच्या व वाहतूक विभागाच्या प्रयत्नांमुळे हे सिग्नल लावण्यात आले असले तरी वाहनधारक मात्र अद्यापही शिस्तीचे पालन करताना दिसत नाहीत.

दुर्दैवाने, अनेक वाहनचालक लाल सिग्नल असतानाही आपली वाहने न थांबवता सरळ पुढे घेऊन जात आहेत. विशेषतः मालवाहू वाहन चालक आणि रिक्षाचालकांमध्ये हा प्रकार जास्त दिसून येतो. नुकताच टॉवर चौकात ग्रीन सिग्नल नसतानाही एक मालवाहू वाहन सिग्नल तोडून पुढे गेले. त्याचप्रमाणे, एक रिक्षाचालक सुद्धा कोर्ट चौकात सिग्नलकडे दुर्लक्ष करून वाहन वेगाने घेऊन गेला.

या असंवेदनशील वागणुकीमुळे दुसऱ्या बाजूने येणाऱ्या वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा किरकोळ अपघात होतात आणि त्यातून वाहनचालकांमध्ये बाचाबाची व वादविवाद होत असल्याचे चित्र दिसून येते.

सिग्नल प्रणाली लावून सुद्धा जर नागरिक त्याचे पालन करत नसतील, तर त्याचा मूळ उद्देशच फोल ठरतो. अशा परिस्थितीत ‘अशा वाहनधारकांना आवर घालणार कोण?’ असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वाहतूक विभागाने अशा नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलावीत, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दंडात्मक कारवाई केली जावी, अशी मागणी जागरूक नागरिकांमधून होत आहे. तसेच, जनजागृती मोहिमा राबवून वाहतूक शिस्त पाळण्याचे महत्त्व नागरिकांना पटवून देणेही गरजेचे ठरत आहे.

जळगाव शहरात शिस्तबद्ध वाहतुकीसाठी आता नागरिकांनीही जबाबदारीने वागणे आवश्यक आहे!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!