जळगावमध्ये सिग्नल सुरू असूनही नियम तोडले जातात

जळगाव प्रतिनिधी |जळगाव शहरात वाहतूक व्यवस्थेचा गोंधळ वाढताना दिसत आहे. शहरातील अनेक मुख्य चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा कार्यरत असूनही नागरिकांकडून त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे अपघाताचा धोका वाढत असून वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे.
आज सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी अजिंठा चौफुली येथे पाहणी केल्यावर एक धक्कादायक बाब समोर आली. येथील सिग्नल असूनही तो बंद अवस्थेत होता. एवढ्या मोठ्या चौकात वाहतूक नियंत्रणासाठी केवळ एकच कर्मचारी उपस्थित होता. एकट्या कर्मचाऱ्याने सर्व दिशांमधील वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करत होता, मात्र वाहनांची संख्या लक्षात घेता हे कार्य अतिशय कठीण होते.
या दरम्यान अनेक वाहनचालकांनी सिग्नलचा नियम मोडून बेधडक मार्गक्रमण केलं. काही दुचाकीस्वार तर सिग्नल बंद असल्याचं कारण देत थेट उलट दिशेने गाड्या चालवत होते.
प्रश्न असा उपस्थित होतो की, शहरातील सिग्नल यंत्रणा असून ती सुरू का नाही? आणि सुरू असल्यास तिचे पालन का होत नाही? या प्रश्नांकडे वाहतूक विभाग व पोलिस प्रशासन किती गंभीरतेने पाहत आहे?
शहरात सिग्नल कार्यान्वित करणे आणि नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे गरजेचे झाले आहे. सिग्नलच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केल्याशिवाय शिस्त लागणार नाही, असे बोलले जात आहे.
याबाबत जळगाव शहर वाहतूक शाखेने लक्ष घालून सिग्नल यंत्रणा सुरळीत सुरू करावी, तसेच आवश्यक मनुष्यबळ नेमून वाहतुकीची अडचण दूर करावी, अशी मागणी होत आहे.