बातम्या

ग्रामपंचायत शेरीच्या सरपंचांना पदच्युत करण्याचा आदेश

धरणगाव (जळगाव) – ग्रामपंचायत शेरी (ता. धरणगाव) येथील सरपंच श्रीमती विमलबाई देविदास चौधरी यांना त्यांच्या पदावरून हटविण्याचा मोठा निर्णय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला आहे. जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्यामुळे त्यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 10 (1-अ) नुसार अनर्ह घोषित करण्यात आले आहे.

प्रकरणाचा संक्षिप्त आढावा

ग्रामपंचायत शेरीसाठी सन 2021 मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली होती. यात नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) महिलांसाठी राखीव असलेल्या सरपंच पदावर विमलबाई देविदास चौधरी निवडून आल्या होत्या. त्यांनी दि. 5 जून 2023 रोजी सरपंचपदाचा कार्यभार स्वीकारला. नियमांनुसार, त्यांना आपले जात वैधता प्रमाणपत्र 10 जुलै 2024 पर्यंत सादर करणे बंधनकारक होते. मात्र, त्यांनी ही आवश्यक कागदपत्रे निर्धारित वेळेत सादर केली नाहीत.

विवाद अर्ज दाखल, सुनावणी आणि अंतिम निर्णय

या संदर्भात श्रीमती अश्विनी नितेश पाटील यांनी 23 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात विवाद अर्ज दाखल केला. अर्जदारांच्या म्हणण्यावर सुनावणी घेतल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी दोन्ही पक्षांना संधी दिली. सुनावणीदरम्यान, विमलबाई चौधरी यांनी 16 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हा जात पडताळणी समितीने निर्गमित केलेले जातवैधता प्रमाणपत्र सादर केले.

तथापि, जिल्हा प्रशासनाने केलेल्या चौकशीत असे दिसून आले की, त्यांनी विहित अंतिम मुदतीत (10 जुलै 2024) जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नव्हते. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 10 (1-अ) चे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले.

 

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी खालीलप्रमाणे आदेश दिला –

1. अर्जदार अश्विनी पाटील यांचा विवाद अर्ज मंजूर करण्यात येत आहे.

2. श्रीमती विमलबाई चौधरी यांना विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र न सादर केल्यामुळे सरपंच पदावरून हटविण्यात येत आहे.

3. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 10 (1-अ) नुसार, ग्रामपंचायतीच्या विद्यमान कालावधीपर्यंत त्या सरपंच पदावर राहण्यास अनर्ह राहतील.

4. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.

5. सदर निर्णय सर्व संबंधितांना कळविण्यात यावा.

 

ग्रामपंचायत मध्ये उलथापालथ होण्याची शक्यता

या निर्णयामुळे ग्रामपंचायत शेरीमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. सरपंच पद रिक्त झाल्याने पुढील प्रक्रिया कशी होणार आणि नवीन सरपंच कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!