महायुतीला धडकी भरवणारी बातमी

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. ही पत्रकार परिषद अतिशय महत्त्वाची आहे. कारण लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला खूप चांगलं यश मिळालं आहे.
महाविकास आघाडीची उद्या मुंबईत दुपारी दोन वाजता वाय. बी. चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे असे तीनही महत्त्वाचे नेते पत्रकार परिषदेत संबोधित करणार आहेत.
ही पत्रकार परिषद का महत्त्वाची आहे?
ही पत्रकार परिषद महत्त्वाची राहण्यामागे काही महत्त्वाची कारणं आहेत. तीनही पक्षांचे प्रमुख नेते थेट माध्यमांना विविध प्रश्नांवर स्पष्ट उत्तर देणार आहेत. यामध्ये महाविकास आघाडीत खरंच बिघाडी आहे का, विधान परिषदेच्या निवडणुकीत काही ठिकाणी ताणले गेलेले संबंध, लोकसभेच्या सांगली जागेवरुन ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये झालेले वाद, या विविध घडामोडींवर आता महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आता भूमिका काय आहे? ते आता स्पष्ट होणार आहे. विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते भाजपला चॅलेंज देतात का, किंवा सत्ताधारी पक्षांना डिवचण्याचा प्रयत्न करतात का? ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.