RDC 5 लाखांची लाच घेताना रंगेहात अडकल्याची मोठी कारवाई
उपजिल्हाधिकाऱ्यांना ५ लाखांची लाच घेताना रंगेहात अटक

छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar):महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून सरकारी अधिकाऱ्यांकडून लाचखोरीची प्रकरणं झपाट्याने समोर येत असून, आता छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी (RDC) विनोद खिरोळकर यांना तब्बल ५ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली आहे. ही लाच वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्यासाठी मागितली गेली होती. या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे.
४१ लाखांची लाचेची मागणी, ५ लाख घेताना अटक
संबंधित प्रकरणात RDC खिरोळकर यांनी तक्रारदाराकडे ४१ लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. यामधील २३ लाख रुपये आधीच घेतले गेले होते. मात्र उर्वरित १८ लाख रुपये देण्याचा तगादा लावण्यात आला होता. याच दरम्यान तक्रारदाराने ACBकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार सापळा रचून ५ लाख रुपये घेताना खिरोळकर यांना अटक करण्यात आली. ही रक्कम अव्वल कारकून त्रिभुवन यांच्यामार्फत घेतली जात होती.
घरझडतीत मिळाली ६७ लाखांहून अधिकची मालमत्ता
ACBने खिरोळकर यांच्या राहत्या घराची झाडाझडती घेतली असता मोठ्या प्रमाणावर मौल्यवान वस्तू व रोकड जप्त करण्यात आली. यामध्ये:
- रोख रक्कम: ₹13,06,380
- सोन्याचे दागिने (589 ग्रॅम): ₹50,99,583 (अंदाजे किंमत)
- चांदीचे दागिने (3 किलो 553 ग्रॅम): ₹3,39,345
- एकूण जप्त मालमत्तेची अंदाजे किंमत: ₹67,45,308
महसूल खात्याचे चांगले निर्णय, पण भ्रष्टाचार वाढीव
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकरी व सामान्य नागरिकांना दिलासा देणारे निर्णय घेतले असून, यामध्ये वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय व फक्त ₹५०० मध्ये भाऊबंदकी वाटणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत रेडीरेकनरच्या १% किंमतीऐवजी आता फक्त ५०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
मात्र असे निर्णय घेऊनही, ग्रामसेवक, तलाठी, नायब तहसीलदार ते उपजिल्हाधिकारी यांच्यापर्यंतचा भ्रष्टाचार काही थांबत नाही हेच या प्रकरणातून दिसून येते. सरकारी फाईल पुढे सरकवण्यासाठी अजूनही लाच दिली जाते, ही बाब अत्यंत दु:खद आहे.