यावल तालुक्यात बिबट्याचा हल्ला – सात वर्षीय आदिवासी बालक ठार, नागरिकांमध्ये संताप

किनगाव साकळी (ता. यावल) – जळगाव वन विभागाच्या कार्यक्षेत्रातील पावल येथील पश्चिम वनक्षेत्रपाल सुनील भिलावे यांच्या कार्यक्षेत्रात बिबट्याच्या हल्ल्यामुळे सात वर्षीय आदिवासी बालकाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
गुरुवार, दि. ६ मार्च २०२५ रोजी दुपारी २ ते ३.३० च्या सुमारास गानकी शिवारात केशा प्रेमा बारेला (वय ७) हा मुलगा आपल्या आईसोबत जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. अचानक हल्ला करत बिबट्याने मुलाला आईच्या हातातून खेचून नेले आणि गंभीर जखमी केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने साखळी-किनगाव परिसरासह संपूर्ण यावल तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात असून, वनविभागाच्या हलगर्जी कारभारावर गंभीर आरोप होत आहेत. नागरिकांचा आरोप आहे की, वन विभागाच्या दुर्लक्षामुळे आणि जनजागृतीच्या अभावामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर नागरिक आणि माध्यम प्रतिनिधींनी पश्चिम वन विभागाचे वनक्षेत्रपाल सुनील भिलावे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे वन विभागाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यावल पूर्व व पश्चिम वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच, जळगाव वन विभागाचे उपवनसंरक्षक (पावल प्रादेशिक) यांच्यावरही या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण असून, स्थानिक आदिवासी बांधव आणि ग्रामस्थांनी वनविभागाच्या निष्काळजी कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.