जळगाव जिल्हा ग्राहक आयोगाचा जयश्री हॉटेला दणका!

जळगाव: धरणगाव तालुक्यातील पाळधी गावाजवळील नॅशनल हायवे क्र.६ रस्त्याच्या कडेला असलेली हॉटेल जयश्री यांना जेवणाच्या बिलात अनधिकृतपणे चार्ज आकारणे चांगलेच महागात पडले आहे.
श्री. मुकेश कोळी व त्याचे मित्र प्रज्वल बारी हे दिनांक १५ मे २०२२ रोजी कामानिमित्त पाळधी येथे गेले होते. जेवणासाठी त्यांनी हॉटेल जयश्री येथे थांबले. त्यावेळी त्यांनी पनीर भुर्जी ₹१२०/-, पनीर बटर मसाला ₹१३०/-, ८ तंदूर रोटी ₹९६/- व १ पानी बॉटल ₹२०/- असा एकूण ₹३६६/- चा आहार घेतला. मात्र बिलावर अतिरिक्त ₹४ चार्ज लावून ₹३७०/- आकारण्यात आले. सदर प्रकार त्यावेळी श्री. मुकेश कोळी यांच्या लक्षात आला नाही. मात्र, दिनांक १७ मे २०२२ रोजी त्यांनी पुन्हा हॉटेलमध्ये जेवणासाठी ₹२०/- किमतीचे नागली पापड, ₹१००/- चे दाल व ₹८४/- चे तंदूर रोटी मागवले. बिलाची एकूण रक्कम ₹२०४/- असताना त्यांना ₹२०५/- चे बिल देण्यात आले.
महाराष्ट्रात आजपासून जोरदार पावसाची शक्यता, ३२ जिल्ह्यांना पावसाचा इशारा
बिलिंग काउंटरवर विचारणा केल्यावर “सुटे पैसे नाहीत म्हणून राऊंड फिगर चार्ज लावतो” असे उत्तर देण्यात आले. श्री. कोळी यांनी ग्राहकांकडून विनाकारण अधिक रक्कम घेणे बेकायदेशीर आहे, असे समजावण्याचा प्रयत्न केला असता हॉटेल मालकाने अरेरावीची भाषा वापरली.याप्रकरणी श्री. कोळी यांनी ‘आपले सरकार’ ऑनलाईन तक्रार निवारण प्रणालीद्वारे मा. जिल्हाधिकारी व राज्य कर आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली. हॉटेल जयश्री ही वस्तू व सेवा कर (GST) कायद्यातील आपसमेळ योजनेखाली नोंदणीकृत असून ग्राहकांकडून अतिरिक्त रक्कम घेणे बेकायदेशीर आहे, हे निष्पन्न झाले.
त्यानंतर श्री. मुकेश कोळी यांनी जळगाव जिल्हा ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल केली. आयोगाने चौकशीअंती निष्कर्ष काढला की हॉटेलने ग्राहक संरक्षण कायदा २०१९ चे कलम २(४७) अंतर्गत अनुसूचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असून दिलेल्या सेवेमध्ये अतिरिक्त चार्ज लावल्यामुळे कलम २(११) नुसार सेवा देण्यास कसूर केली आहे.
या प्रकरणात आयोगाने दिनांक ५ जून २०२५ रोजी हॉटेल जयश्री यांना दोषी ठरवत खालीलप्रमाणे आदेश दिले आहेत:
🔹 दिनांक १५ मे २०२२ रोजी ₹४ व
🔹 दिनांक १७ मे २०२२ रोजी ₹१
या अतिरिक्त आकारलेल्या रकमेवर ९% दराने व्याज देण्याचे आदेश.
🔹 मानसिक व शारीरिक त्रासापोटी ₹१,००,०००/-
🔹 न्यायालयीन व इतर खर्चासाठी ₹१५,०००/-
ग्राहकांचा न्यायालयीन विजय हा इतर सर्व सेवाप्रदाता, व्यापारी व रेस्टॉरंट्ससाठी एक इशारा ठरू शकतो, असे म्हटले जात आहे. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार कोणत्याही प्रकारे अतिरिक्त चार्ज लावणे किंवा चुकीच्या पद्धतीने पैसे वसूल करणे बेकायदेशीर ठरते