जळगाव जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेला ‘फुल कॉपी’चा सुळसुळाट! प्रशासन डोळेझाक करतेय का?

जळगाव : जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये सध्या दहावीच्या परीक्षेच्या नावाखाली कॉपीचा सुळसुळाट सुरू असून, प्रशासन मात्र केवळ औपचारिक कारवाई करत असल्याचे चित्र आहे. परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त असतानाही, काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सर्रास कॉपी करण्यास मोकळीक मिळत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची गाडी आली, की कॉपी लपवली जाते!
विश्वासू सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही शाळांमध्ये कॉपी पुरवण्यासाठी नियोजनबद्ध यंत्रणा उभी करण्यात आली आहे. जर वरिष्ठ पोलीस अधिकारी किंवा प्रशासनाची गाडी परीक्षा केंद्राच्या दिशेने येत असेल, तर तत्काळ शाळेतील लोकांना याची खबर दिली जाते. यानंतर, वर्गांमधील सर्व विद्यार्थ्यांकडून कॉपी जमा करून लपवण्यात येते. काही ठिकाणी तर पोत्याने कॉपी वर्गातून बाहेर काढण्याचे प्रकार समोर आले आहेत.
शाळेच्या बाहेर गुप्त पहारेकरी!
कॉपीचे हे सत्र कुठेही बाहेर फुटू नये म्हणून, काही शाळांमध्ये बाहेर पहारा ठेवला जातो. शाळेच्या मुख्य रस्त्यांवर काही लोक उभे करून ठेवले जातात, जे प्रशासनाच्या हालचालींवर लक्ष ठेवतात. जर कोणी अधिकारी किंवा अनपेक्षित पाहुणे आले, तर त्वरित परीक्षा केंद्रात फोन करून सावध केले जाते. “गाडी आलेली आहे, मुलांनी कॉपी थांबवा” असा संदेश दिला जातो, आणि काही मिनिटांत संपूर्ण वर्ग ‘स्वच्छ’ केला जातो.
प्रशासन काय करतंय?
राज्य सरकारने आणि शिक्षण विभागाने परीक्षा कॉपीमुक्त पार पडावी यासाठी कडक नियम लागू केले आहेत. काही ठिकाणी ड्रोनच्या मदतीने परीक्षा केंद्रांवर नजर ठेवली जात आहे. पण प्रत्यक्षात जळगाव जिल्ह्यात काही केंद्रांवर या नियमांची पायमल्ली होताना दिसते. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास, पुढील परीक्षांमध्ये परिस्थिती अधिक बिघडण्याची शक्यता आहे.
कॉपीमुक्त परीक्षा होणार का?
विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि शिक्षण व्यवस्थेच्या शुद्धतेसाठी अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. संबंधित शाळांच्या व्यवस्थापनांवर, तसेच हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली, तरच भविष्यात अशा गैरप्रकारांना आळा बसेल. अन्यथा, “कॉपीमुक्त परीक्षा” केवळ कागदावरच राहील, आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता मूल्यांकनाची संपूर्ण प्रक्रिया गालबोट लागलेलीच राहील.
शाळेच्या निकालासाठी ‘फुल कॉपी’चा आधार – गुणवत्तेचा बळी कोण देणार?”
जळगाव जिल्ह्यातील काही शाळा दहावीच्या परीक्षेत अधिक टक्केवारी मिळवण्यासाठी खुलेआम कॉपीखोरीला चालना देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निकाल चांगला लागावा, शाळेची टक्केवारी वाढावी, आणि नाव मोठे व्हावे यासाठी अनेक शाळा नियोजनबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांना कॉपीची सुविधा पुरवतात.
वरिष्ठ अधिकारी किंवा शिक्षण विभागाचा कोणताही अधिकारी केंद्रावर आला, की काही मिनिटांत कॉपी हटवली जाते आणि परिस्थिती सामान्य असल्याचा आभास निर्माण केला जातो. बाहेर गुप्त देखरेख ठेवल्यामुळे कोणतीही चौकशी होण्याआधीच व्यवस्थापन सावध होते.
या प्रकारामुळे प्रामाणिक विद्यार्थी आणि मेहनती शिक्षकांवर अन्याय होत आहे. गुणवत्तेऐवजी फक्त टक्केवारी वाढवण्याचा हा प्रयत्न शिक्षण व्यवस्थेचा पाया कमकुवत करत आहे. प्रशासनाने यावर त्वरित कारवाई केली नाही, तर “कॉपीमुक्त परीक्षा” ही संकल्पना केवळ दिखावा ठरेल आणि शैक्षणिक मूल्ये पूर्णतः धोक्यात येतील.