यावल शहरात ‘बच्चा गँग’ आक्रमक – कायदा व जातीय सलोखा धोक्यात

यावल शहरात अल्पवयीन मुलांची एक टोळी (बच्चा गँग) आक्रमक बनली असून, त्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या टोळीचे संघटन कौतुकास्पद वाटत असले, तरी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून तसेच जातीय सलोखा अबाधित राहावा यासाठी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे सुज्ञ नागरिक, समाजसेवक आणि स्थानिक मंडळींचे मत आहे.
लहान मुलांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे नागरिकांत अस्वस्थता
मिळालेल्या माहितीनुसार, शहरात ही टोळी इतर लहान मुलांना रस्त्यात अडवून त्यांच्यावर हल्ले करत आहे. या गँगच्या सदस्यांकडून जबरदस्तीने काही विशिष्ट घोषणाबाजी करण्यास भाग पाडले जाते, आणि नकार दिल्यास मारहाण केली जाते, अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारी स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
शांततेसाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलण्याची गरज
या घटनांमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा धोक्यात येऊ शकतो. काही लोकप्रतिनिधी व स्थानिक मंडळी या विषयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असले तरी, मुलांच्या अशा संघटनांचा वापर चुकीच्या पद्धतीने होऊ नये यासाठी प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे.
पोलिसांनी कठोर पावले उचलावीत – नागरिकांची मागणी
शहरातील सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून पोलीस प्रशासनाने त्वरित योग्य ती कारवाई करावी, अशी चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरू आहे. तसेच, पालकांनी आपल्या मुलांवर विशेष लक्ष द्यावे, जेणेकरून अल्पवयीन मुले चुकीच्या मार्गाला लागणार नाहीत, असे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी मांडले आहे.
यावल शहरातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी त्वरित कठोर कारवाई करावी, अशी स्थानिक नागरिक आणि समाजसेवकांची मागणी आहे.