जिल्हा परिषद आपल्या दारी उपक्रमांतर्गत यावल येथे तक्रार निवारण दिन

जळगाव, दि. २३ जून: जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या “जिल्हा परिषद आपल्या दारी” या लोकाभिमुख उपक्रमांतर्गत यावल तालुक्यातील पंचायत समिती येथे आज तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला परिसरातील नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला असून, उपस्थित अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे तक्रारींचे त्वरित निवारण होण्यास मदत झाली.
या कार्यक्रमात जिल्हा परिषद व तिच्या अधिनस्त विविध विभागांशी संबंधित नागरिकांकडून एकूण २४ तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारींबाबत तत्काळ कार्यवाही करत काही तक्रारींचे जागेवरच निवारण करण्यात आले. उर्वरित तक्रारींच्या निराकरणासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधून वेळापत्रकानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.
कार्यक्रमास यावलचे आमदार मा. अमोल जावळे, चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. चंद्रकांत सोनवणे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे, तसेच जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख व संबंधित अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तक्रार निवारण प्रक्रियेदरम्यान नागरिकांनी आपल्या अडचणी, समस्या व तक्रारी अत्यंत मोकळेपणाने मांडल्या. प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादामुळे उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या या उपक्रमाच्या माध्यमातून ऐकल्या गेल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांनी समाधान व्यक्त करत सांगितले की,
> “या उपक्रमाचा मुख्य हेतू म्हणजे प्रशासन थेट जनतेच्या दारी नेणे. तक्रारी व समस्यांचे तात्काळ निराकरण करून नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास दृढ करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”
तसेच, जिल्हा परिषद आपल्या दारी या उपक्रमांतर्गत भविष्यातही तालुकास्तरावर अशा प्रकारचे तक्रार निवारण दिन नियमितपणे आयोजित करण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले.
या उपक्रमामुळे स्थानिक प्रशासन व नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ झाला असून, लोकाभिमुख व उत्तरदायी प्रशासनाची प्रतिमा आणखी मजबूत होण्यास मदत झाली आहे.