मुक्ताईनगर, बोदवड, रावेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करून, शेतकरी बांधवांना आर्थिक नुकसान भरपाई देणे बाबत…

शेतकरी बांधवानी जुन-जुलै महिन्यात खरिपाची पेरणी केल्यानंतर सुरुवातीला व्यवस्थित पाऊस झाल्याने पिके चांगले बहरल्याने, शेतकरी बांधवां मध्ये आनंदाचे वातावरण होते. त्यामुळे शेतकरी बांधवानी पिकांना मुबलक प्रमाणात रासायनिक खते, कीटकनाशके फवारणी केली, परंतु जुलै महिन्यापासून सतत कोसळत असलेल्या संततधार पावसाने मुक्ताईनगर, बोदवड, रावेर तालुक्यात ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे शेतातील पाण्याचा निचरा न झाल्यामुळे शेतात पाणी तुंबले आहे. त्यामुळे कपाशी पिकांवर बोंडअळी, मर, लाल्या इ. रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच सततच्या पावसामुळे कपाशीला असलेल्या कैऱ्या काळ्या पडून सडायला लागल्या आहेत, काही ठिकाणी कापसाची फुटलेली बोंडे खराब झाली आहेत. यामुळे कापुस पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी बांधव मेटाकुटीला आले आहेत.तसेच काढणीला आलेले सोयाबिन, मका, उडीद, मुग, भुईमूग या पिकांचे अतोनात नुकसान होऊन हि पिके जमीनदोस्त झाली आहेत. सोयाबिन, मक्याच्या कणसांना कोंब फुटले आहेत, काही मंडळात गेल्या दोन दिवसात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे कापून टाकलेला मका, सोयाबिन वाहून गेले आहे. सुरवातीला पिकांची स्थिती उत्तम असल्याने शेतकरी बांधवानी पिकांवर आतापर्यंत लाखो रुपये खर्च केला आहे. परंतु ओल्या दुष्काळाच्या या अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधवांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. यामुळे शेतकरी बांधव आर्थिक गर्तेत सापडून त्यांच्यापुढे जगावे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे.अशा परिस्थितीत सरकारने अन्नदात्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानीचे पंचनामे करून पिकपेऱ्या नुसार तत्काळ शेतकरी बांधवांना सरसकट भरीव स्वरूपात आर्थिक मदत करून, हवालदिल झालेल्या शेतकरी बांधवांना आर्थिक गर्तेतून वाचवावे