दहावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचा प्रकार उघड! यावल तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेला हादरा

यावल तालुक्यातील किनगाव येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना सर्रासपणे कॉपी पुरवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सरदार वल्लभभाई पटेल स्कूलच्या मुख्याध्यापिका शीला तायडे, शिक्षक अमोल भालेराव आणि आशा युसूफ पटेल यांनी मिळून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवली, असा गंभीर आरोप असून, याप्रकरणी यावल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
नेमके काय घडले?
सोमवारी सकाळी दहावीच्या मराठी द्वितीय व तृतीय विषयाचा पेपर सुरू असताना, गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांना माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा फोन आला. या फोनद्वारे त्यांना मनोज राणे यांच्या ऑटोरिक्षामध्ये मुख्याध्यापिका शीला तायडे, शिक्षक अमोल भालेराव आणि आशा युसूफ पटेल हे नवनीतच्या अपेक्षित प्रश्नसंचातून उत्तरं पाहून कॉपी तयार करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची माहिती मिळाली.
यावर गटशिक्षणाधिकारी धनके यांनी तातडीने चौकशी केली. चौकशीत हा प्रकार पूर्णपणे सत्य असल्याचे निष्पन्न झाले. परिणामी, गटशिक्षणाधिकारी धनके यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गंभीर परिणाम
दहावी ही विद्यार्थ्यांसाठी सर्वांत महत्त्वाची परीक्षा असते. याच परीक्षेत शिक्षकांनीच कॉपी पुरवण्यासारखा प्रकार केल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा प्रकार म्हणजे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरील एक गंभीर डाग आहे.
शिक्षण विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे शिक्षण विभागाची नैतिकता आणि कार्यक्षमता यावर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. परीक्षांमध्ये पारदर्शकता राखली जावी, यासाठी प्रशासन वारंवार नियम आणि दक्षता घेत असते. मात्र, जेव्हा शिक्षकच अशा प्रकारात गुंतलेले असतात, तेव्हा विद्यार्थ्यांना योग्य दिशा कोण देणार?
पोलिसांचा पुढील तपास सुरू
यावल पोलीस ठाण्याने या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून, आरोपींवर कठोर कारवाई होणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शिक्षण क्षेत्राच्या पवित्रतेला कलंक लावणाऱ्या अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी यापुढे कठोर पावले उचलली जातील का, याचीही चर्चा रंगली आहे.
शिक्षण क्षेत्राला हादरा! परीक्षेतील विश्वासार्हतेवर मोठा डाग
या संपूर्ण घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. परीक्षांमध्ये नकल प्रकरणं नवीन नाहीत, पण शिक्षक आणि मुख्याध्यापकच असे कृत्य करत असल्यास, शिक्षण व्यवस्थेच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असेच म्हणावे लागेल.
जिल्ह्यात पोलिसांकडून ७९ कॉपीबहाद्दरांवर कारवाई
दहावी, बारावीच्या परीक्षांदरम्यान जळगाव जिल्हा पोलिस प्रशासनाकडून कॉपी पुरविणाऱ्या ७९ जणांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे.
तालुकानिहाय झालेली कारवाई
पारोळ २५, एरंडोल १७, यावल१५, धरणगाव५, भडगाव२, चाळीसगाव ग्रामीण२, चाळीसगाव शहर ३, मुक्ताईनगर-३, सावदा-३, वरणगाव१, चोपडा ग्रामीण१, पाचोरा२ अशा एकूण ७९ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
आता पुढे काय?
या घटनेनंतर शिक्षण विभाग आणि पोलिस प्रशासन कसे पावले उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या या शिक्षकांवर कठोर कारवाई झाली नाही, तर अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.