गुलाबराव पाटील साहेबांच्या संकल्पनेतून २१०० वारकऱ्यांसह पंढरपूरकडे इतिहासातली भव्य वारी!

जळगाव, दि. १७ जून (प्रतिनिधी):महाराष्ट्राच्या अध्यात्मिक परंपरेचा मानबिंदू असलेल्या पंढरपूर वारीसाठी जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील सुमारे दोन हजार भाविकांनी आज रेल्वेने भक्तिभावाने पंढरपूरकडे प्रस्थान केले.ही विशेष रेल्वे यात्रा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे.आज रात्री साडेनऊ वाजता जळगाव रेल्वे स्थानकावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवून या भक्तिगीतांनी भरलेल्या रेल्वेला रवाना करण्यात आले.रेल्वे स्थानकावर “ज्ञानोबा माऊली तुकाराम”, “विठू माऊली तू माझा सखा” अशा अभंगांचा गजर, टाळ, मृदंग याच्या गजरात उत्सवाचे, भावनेचे, भक्तीचे अनोखे वातावरण अनुभवायला मिळाले.
सेवेची भावना, अध्यात्मिक जाणीव – उपक्रमामागील उद्देश
जळगाव ग्रामीण मतदारसंघातील अनेक नागरिकांना पंढरपूर वारीची प्रबळ इच्छा असूनही, वयोमान, आर्थिक अडचणी, किंवा तब्येतीच्या अडचणीमुळे ती इच्छा पूर्ण होऊ शकत नाही ५० ते ६५ वयोगटातील भाविकांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून गेल्या काही वर्षांपासून ही विशेष रेल्वे यात्रा सातत्याने राबवली जात आहे.ही यात्रा केवळ दर्शनापुरती मर्यादित नसून, ही एक भाविकांच्या श्रद्धेचा आणि सेवाभावाचा आदर्श उपक्रम ठरतो.
उत्कृष्ट नियोजन आणि सेवा-सुविधा
ही यात्रा यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील आणि त्यांच्या टीमने अचूक नियोजन केले.
प्रत्येक भाविकाच्या सुविधेची काळजी घेत, प्रवास सुखकर आणि भक्तिमय करण्यासाठी पुढील व्यवस्था करण्यात आली होती:
भोजन व्यवस्था: सकस, स्वच्छ आणि वेळेत नाश्ता, जेवण, चहा याचे नियोजनबद्ध वितरण
पिण्याचे पाणी: सर्व भाविकांना बाटलीबंद शुद्ध पाण्याची व्यवस्था
वैद्यकीय सेवा: डॉक्टरांची टीम प्रवासात साथ देणार, आपत्कालीन वैद्यकीय मदतीची तत्काळ सोय स्वच्छता आणि सुरक्षितता: प्रत्येक डब्याची विशेष स्वच्छता आणि स्वयंसेवकांच्या माध्यमातून भाविकांच्या सुरक्षिततेची पूर्ण जबाबदारी
दर्शनाचा प्रवास – वेळापत्रक
१७ जून: रात्री जळगावहून पंढरपूरकडे रेल्वेने प्रस्थान
१७-१८ जून: दोन दिवस पंढरपूर मुक्काम व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन
१८ जून रात्री: पंढरपूरहून परतीचा प्रवास
१९ जून सकाळी: जळगावमध्ये आगमन
पालकमंत्र्यांची प्रतिक्रिया – भावना आणि कृतज्ञता
“माझ्या मतदारसंघातील एकही भाविक विठ्ठलाच्या दर्शनाला मुकू नये, हीच भावना मनात ठेवून हा उपक्रम सुरू केला आहे.हजारो भाविक सुखरूपपणे पंढरपूरकडे रवाना झाले, याचे मला समाधान आहे.कार्यकर्त्यांनी दिलेले योगदान हे माझ्यासाठी प्रेरणादायी असून, मी त्यांचा मनापासून आभारी आहे.”अशी भावना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.
सहभाग आणि सहकार्य
या यात्रेच्या आयोजनात शिवसेना, युवासेना, GPS ग्रुप, विकी बाबा ग्रुप, तसेच अनेक सामाजिक संस्था, स्वयंसेवक यांनी आपले मोलाचे योगदान दिले.रेल्वेला झेंडा दाखवताना शिवसेना पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या यात्रेची वैशिष्ट्ये – एका दृष्टीक्षेपात
✅ सुमारे २ हजार भाविकांचा सहभाग
✅ खासगी खर्चातून स्वतंत्र रेल्वे सेवा
✅ प्रवासात भोजन, औषधे, डॉक्टरांची व्यवस्था
✅ पंढरपूर येथे दोन दिवस मुक्काम व दर्शन
✅ १९ जून रोजी सकाळी जळगावमध्ये परतीचे आगमन
✅ पालकमंत्र्यांच्या हस्ते झेंडा दाखवून यात्रा प्रस्थान
✅ प्रत्येक भाविकांची वैयक्तिक विचारपूस व संवाद