बातम्या

शासकीय नोकर नव्हे, जनतेचे सेवक व्हा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगावात नियुक्ती पत्र वितरण सोहळा उत्साहात संपन्न

जळगाव, दि. ४ ऑक्टोबर  : शासकीय नोकरीत रुजू होताना आपल्या मनात केवळ ‘नोकरी’ ही भावना न ठेवता ‘जनतेची सेवा’ हीच भावना ठेवा. शासकीय नोकर म्हणून नव्हे तर जनतेचे सेवक म्हणून काम करा,” असे भावनिक प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित अनुकंपा भरती २०२५ अंतर्गत गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गातील उमेदवार, तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) लिपिक टंकलेखक भरती २०२३ मधून निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्ती आदेश वितरण सोहळ्यात ते मार्गदर्शन करत होते

या वेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे गुलाबराव पाटील म्हणालेकी, “तुमच्याकडे आलेल्या प्रत्येक नागरिकाशी चांगले वागा. प्रामाणिकपणे, तणावरहित वातावरणात आपली कर्तव्य बजावा. आपल्या कुटुंबियांनी संकटात तुम्हाला घडविले, वाढविले, शिक्षण दिले – त्यांची जबाबदारी सांभाळा. जनतेची सेवा हीच खरी देवपूजा आहे. फिटनेस सांभाळत, आनंदाने आणि उत्साहाने काम करा. जनतेची नाळ जोडली गेली तरच अधिकारी म्हणून तुमची खरी ओळख निर्माण होईल.

खासदार स्मिताताई वाघ म्हणाल्या की, “नोकरी ही केवळ रोजगार नाही तर समाजाची सेवा करण्याची संधी आहे. प्रामाणिकपणे काम केले तर पुढची पिढी तुमचा गौरव करेल. जनतेच्या सेवेतून तुमची आठवण कायम राहिली पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.

शासकीय नोकर नव्हे, जनतेचे सेवक व्हा - पालकमंत्री गुलाबराव पाटील

आमदार राजूमामा भोळे म्हणाले की, , “राज्य शासनाने एकाच वेळी दहा हजार नियुक्त्या देऊन मोठे कार्य केले आहे. समाजातील गरजू नागरिकांना नेहमी सहकार्य करा. नोकरी करताना जनतेचे आशीर्वाद मिळाले पाहिजेत,” असे त्यांनी नमूद केले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपस्थित उमेदवारांना आवाहन केले,“सेवेत असताना निस्वार्थ भावनेने काम करा. समस्यांचे निराकरण शोधण्याची क्षमता विकसित करा. कार्यक्षमतेत इतकी प्रगती करा की वरिष्ठ अधिकारी स्वतः तुमच्याकडे येतील. संयम, प्रामाणिकपणा आणि आरोग्य याकडे लक्ष द्या.”

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल आणि जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनीही नवनियुक्त कर्मचाऱ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

३१३ उमेदवारांना नियुक्ती आदेश
शासनाच्या “१५० दिवसांच्या उपक्रमांतर्गत” झालेल्या या सोहळ्यात गट ‘क’ संवर्गातील ४१, गट ‘ड’ संवर्गातील १४७ आणि एमपीएससीद्वारे शिफारस झालेले १२५ असे एकूण ३१३ उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरित करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व आस्थापना विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी केले. कार्यक्रमात नियुक्ती मिळालेल्या उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधानाची झळाळी दिसत होती. त्यांनी शासन व जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!