१०वी उत्तीर्ण मुलाच्या अकरावी प्रवेशासाठी १० हजारांची लाच मागितली

३१ मे २०२५ | जळगाव – सरकारी शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यात समोर आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील गिरणा विद्या प्रसारक मंडळाच्या शाळेत अकरावी प्रवेशासाठी तब्बल १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोघे शिक्षक धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहाथ अटक केले.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये उपशिक्षक गुलाब विरभान साळुंखे व लिपिक उल्हास बागुल यांचा समावेश आहे. ही कारवाई ३० मे रोजी शाळेच्या आवारात करण्यात आली.
प्रवेशासाठी मागितली २० हजारांची मागणी
तक्रारदार हे मेहुणबारे गावचे रहिवासी असून त्यांचा मुलगा गिरणा विद्या प्रसारक मंडळाच्या मेहुणबारे माध्यमिक विद्यालयातून इ. १०वी उत्तीर्ण झाला आहे. पुढील शिक्षणासाठी मुलाचा अकरावी (सायन्स) वर्गात प्रवेश घ्यावा म्हणून तक्रारदार व त्यांचा मुलगा २७ मे रोजी संबंधित शाळेत गेले होते. तेव्हा त्यांनी उपशिक्षक गुलाब साळुंखे व लिपिक पंजाबराव देशमुख यांची भेट घेतली.
या वेळी शिक्षक व लिपिक यांनी अकरावी प्रवेशासाठी एकूण २० हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यापैकी १० हजार रुपये ऑनलाईन अर्ज केल्यानंतर, तर उर्वरित १० हजार रुपये प्रवेशाच्या वेळी देण्यास सांगितले. तक्रारदाराने ही मागणी नाकारून २८ मे रोजी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
३० मे रोजी सापळा आणि रंगेहाथ अटक
तक्रारीची पडताळणी २९ मे रोजी पंचासमक्ष करण्यात आली. त्यानंतर ३० मे रोजी म्हणजेच शुक्रवारी, ACB पथकाने शाळेच्या आवारात सापळा रचला. त्यावेळी उपशिक्षक गुलाब साळुंखे यांनी तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताच त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली.
या प्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात दोघा शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई धुळे ACB चे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी व त्यांच्या पथकाने केली.
शिक्षण संस्थांची विश्वासार्हता धोक्यात
या प्रकारामुळे ग्रामीण भागातील शिक्षण संस्था व शिक्षकांविषयी शंका निर्माण झाली आहे. सरकारी शिक्षण व्यवस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या पालकांची आर्थिक व मानसिक पिळवणूक करणाऱ्या घटकांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.