महाराष्ट्रात पोलिस भरती लवकरच? | दीपेश पाटील यांची अजित पवारांकडे ठाम मागणी!

पोलिस भरती प्रक्रिया सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घ्यावी; दीपेश पाटील यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी राज्यातील हजारो तरुण-तरुणींच्या आशा-आकांक्षांना दिशा मिळावी यासाठी महाराष्ट्रात पोलिस भरती प्रक्रिया सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांमध्ये पार पाडावी, अशी ठाम मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मंत्रालयात पार पडलेल्या एका महत्त्वाच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रालयाच्या गेटवर पोहोचताच दीपेश पाटील यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. विशेषतः राज्यातील युवा वर्गाच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला पोलिस भरतीचा विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला.
दीपेश पाटील यांनी अजित पवार यांना निवेदन सादर करताना सांगितले की, “राज्यातील वाढती लोकसंख्या, वाढते गुन्हेगारीचे प्रमाण आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस दलाची संख्या अपुरी पडत आहे. अनेक पोलीस ठाणी आणि मुख्यालयांमध्ये कर्मचारी तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर लवकरात लवकर भरती प्रक्रिया होणे अत्यावश्यक आहे.”
तरुणाईचे स्वप्न धुसर होत आहे…
राज्यात हजारो तरुण-तरुणी गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिस भरतीची तयारी करत आहेत. मात्र भरती प्रक्रिया लांबणीवर जात असल्याने त्यांच्यावर मानसिक ताण येतो आहे. काही वेळा तर वयोमर्यादा ओलांडण्याची स्थिती उद्भवते आणि तरुणांचे स्वप्न अपूर्णच राहते. विद्यार्थ्यांची सध्याची स्थिती पाहता, शासनाने या बाबत गंभीर दखल घेणे गरजेचे असल्याचे दीपेश पाटील यांनी म्हटले आहे.
अजित दादा पवार यांनी निवेदनातील मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करत गृहविभागाशी यासंदर्भात चर्चा करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती दीपेश पाटील यांनी दिली आहे.