जळगाव पोलिस लाईनमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न – १०५० कुटुंबे अडचणीत

जळगाव शहरातील पोलिस लाईन परिसरात गेल्या ५-६ दिवसांपासून सुरू असलेल्या पाण्याच्या समस्येमुळे येथील रहिवासी प्रचंड त्रस्त झाले आहेत. या परिसरात एकूण १०५० कुटुंबे वास्तव्यास असून, सध्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.
या समस्येमुळे येथील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही महिला गर्भवती असून, काही आजारी रुग्ण देखील आहेत. अशा परिस्थितीत घराच्या खालून वरच्या मजल्यांवर पाणी नेणे अत्यंत कठीण झाले आहे. परिणामी, पाण्याच्या गरजा भागवण्यासाठी नागरिकांना बाहेरून पाण्याचे जार मागवावे लागत आहेत.
या गंभीर समस्येमुळे हैराण झालेल्या महिलांनी जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. यावर पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी समाधानकारक उत्तर देत सांगितले की, ते स्वतः याबाबत माहिती घेऊन लवकरात लवकर या समस्येचा निकाल लावण्याचा प्रयत्न करतील.
महिलांनी असेही सांगितले की, महानगर पालिकेचे अधिकारी त्यांच्या तक्रारीकडे लक्ष देण्यास तयार नाहीत, त्यामुळे त्यांचा रोष अधिकच वाढला आहे.
ही समस्या अत्यंत गंभीर असून, येथील रहिवाशांना लवकरात लवकर दिलासा मिळावा यासाठी पोलीस प्रशासन आणि महानगर पालिका यांनी एकत्र येऊन योग्य तो उपाय करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.