“हळदीचा रंग सुकायच्या आत मनोज पाटील सीमेवर!” – देशभक्तीचा अफलातून निर्णय

पाचोरा (जळगाव) : सध्या पाकिस्तानविरोधातील हवाई कारवाईनंतर देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने निमलष्करी दलातील रजेवर गेलेल्या सर्व जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील रहिवासी जवान मनोज पाटील यांना लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तातडीने कर्तव्यावर रुजू होण्याचे आदेश मिळाले. त्यांनी देशसेवेला प्राधान्य देत गुरुवारी सीमेवर रवाना होण्याचा निर्णय घेतला.
जवान मनोज पाटील हे २०१७ पासून सैन्य दलात कार्यरत आहेत. अलीकडेच त्यांचा विवाह नाचणखेडे (ता. पाचोरा) येथील रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी हिच्याशी निश्चित झाला होता. या पार्श्वभूमीवर मनोज काही दिवसांसाठी गावाला रजेवर आले होते. पाच मे रोजी पाचोरा येथे मोठ्या थाटामाटात त्यांच्या लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
मात्र, देशाच्या सीमारेषेवर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे त्यांच्या रजेतील विश्रांती अपूर्णच राहिली. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सैन्य दलाकडून तातडीने परतण्याचे आदेश मिळाल्याने मनोज यांनी कोणतीही तक्रार न करता कर्तव्याला प्राधान्य देत गुरुवारी लष्करी सेवेसाठी रवाना होण्याचा निर्णय घेतला.
“मुलगा देशासाठी निघतोय, त्याचा आम्हाला अभिमान वाटतो,” असे भावनिक उद्गार मनोज पाटील यांचे वडील ज्ञानेश्वर पाटील यांनी यावेळी काढले. नववधू यामिनी हिनेही, “देशापेक्षा मोठे काही नाही, कर्तव्य महत्त्वाचे,” असे म्हणत मनोजच्या निर्णयाला साथ दिली. मनोज सीमेवर रवाना होत असताना पाचोरा रेल्वे स्थानकावर संपूर्ण कुटुंबासह नववधू, आई-वडील, भाऊ आणि इतर नातेवाईकांनी त्याला निरोप दिला.
हा प्रसंग उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणणारा होता. हळदीचा रंगही ओसरायचा बाकी असताना, सैनिकाने देशसेवेसाठी घेतलेले पाऊल हे तरुण पिढीला स्फूर्तिदायक ठरत आहे.