बातम्या

४५ लाखांची डिमांड… आणि थरारक पोलिस पाठलाग!

दिनांक ३०/०५/२०२५ रोजी अनिल गणेश राठोड, रा. वाघले, ता. चाळीसगाव, जि. जळगांव यांचे वडील गणेश ताराचंद राठोड (वय ४२, रा. वाघले) यांचे काही अनोळखी इसमांनी अपहरण केले. अपहरणकर्त्यांनी त्यांच्या सुटकेसाठी तब्बल ४५ लाख रुपयांची खंडणी मागितली असल्याची फिर्याद संबंधितांनी पोलिसांकडे दिली होती.

या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. १३७/२०२५ नुसार भा.दं.वि. कलम १४०(२) अंतर्गत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी पीडित व्यक्तीला मारहाण करतानाचे व्हिडिओ त्यांच्या मुलास पाठवत धमकी दिली, तसेच व्हॉइस कॉलद्वारे पैसे न दिल्यास जीव घेण्याची धमकी दिली जात होती.

या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्या पथकाला तात्काळ कारवाईचे निर्देश दिले.

त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पुढील आरोपींची ओळख पटवली:

1. जयेश दत्तात्रय शिंदे (वय-२८, रा. सैनिक कॉलनी, चाळीसगाव)

2. श्रावण पुंडलिक भागोरे (रा. स्वामी विवेकानंद कॉलनी, नांदगाव, जि. नाशिक)

दोघेही मौजे मोझर्ण, ता. नांदगाव परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली. दरम्यान, आरोपी हे मनमाड रेल्वे स्टेशनकडे मोटारसायकलवरून जात असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी पाठलाग सुरू केला. पोलिस वाहन लक्षात येताच आरोपींनी मोटारसायकल रस्त्यावर सोडून रस्त्यालगतच्या शेतातून पळण्याचा प्रयत्न केला. सुमारे ५ किमी पाठलाग करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

तपासात आरोपींनी कबुली दिली की, त्यांचे मित्र जनार्दन बाळू आवारे उर्फ राजू पाटील (रा. शिदी, ता. चाळीसगाव, ह.मु. डोंबिवली, जि. ठाणे) आणि सोनू भाऊ (पूर्ण नाव अज्ञात, रा. मुंबई) यांच्या सांगण्यावरून गणेश ताराचंद राठोड यांचे अपहरण केले. त्यांना मारहाण करत त्याचे व्हिडिओ मुलगा अनिल राठोड याला मोबाईलवरून पाठवून ४५ लाखांची खंडणी मागण्यात आली होती.

पीडित व्यक्तीस चाळीसगाव तालुक्यातील पाटणा गावाजवळील एका शेतातील शेडमध्ये डांबून ठेवले गेले होते. त्यानंतर त्यांना विंचूर, लासलगाव येथील जंगलात नेऊन सोडण्यात आले. उर्वरित दोन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

पोलिसांनी लासलगावजवळील जंगलात सर्च ऑपरेशन केल्यानंतर जखमी अवस्थेत पीडित गणेश राठोड यांना शोधून त्यांची सुटका केली. त्यांच्यासह दोन्ही आरोपींना चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

सदर कारवाई यशस्वीपणे पार पडली ती खालील अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली:

  1. डॉ. श्री. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव)
  2. सौ. कविता नेरकर (अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव)
  3. श्री. राजेंद्रसिंह चंदेल (उपविभागीय पोलीस अधिकारी, चाळीसगाव उपविभाग)
  4. श्री. बबन आव्हाड (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव)

कारवाईत सहभागी पोलीस अधिकारी व कर्मचारी:

  • पोउपनि शेखर डोमोळे
  • पोह. संदीप पाटील
  • पोह. मुरलीधर धनगर
  • पोकों. महेश पाटील
  • पोकों. सागर पाटील
  • पोकों. भुषण शेलार
  • पोकों. ईश्वर पाटील
  • पोकों. भुषण पाटील
  • पोकों. जितेंद्र पाटील
  • चापोह. दीपक चौधरी

संपूर्ण कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!