रमाई माता जयंती मिरवणुकीत गोंधळ – वरणगांव येथे दगडफेक, गुन्हा दाखल

वरणगांव, ता. भुसावळ: वरणगांव येथे रमाई माता जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत गाणी वाजवण्यावरून वाद निर्माण होऊन दगडफेक झाली. या प्रकरणी वरणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना:
दि. 07 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 9:30 वाजता सिद्धेश्वर नगर येथील गणपती मंदिराजवळ ही घटना घडली. रमाई माता जयंती निमित्त निघालेल्या मिरवणुकीत साउंड सिस्टीम ऑपरेटर आकाश निमकर यांनी भीमगीते वाजवली. त्यावर आरोपींनी त्याला जबरदस्ती खाली उतरवले आणि “तू शिवाजी चौकात भीमगीते का वाजवतो?” असे विचारत शिवीगाळ करून मारहाण केली.
यानंतर, भोला रामा इंगळे यांनी याला विरोध केला असता आरोपींनी “बंद करा महारांचे गाणे, आम्ही या सगळ्यांना पाहून घेतो,” असे म्हणत संपूर्ण मिरवणुकीवर दगडफेक केली. या दगडफेकीत ट्रॉलीवर ठेवलेल्या रमाई माता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीच्या पायाजवळ दगड लागल्याने मूर्तींचे नुकसान झाले.
फिर्याद व आरोपी:
या प्रकरणी आशाबाई कैलास बि-हाडे (वय 45, रा. सिद्धेश्वर नगर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी निलेश काळे, निलेश पवार, कृष्णा माळी, गोपाळ माळी, गोपाळ राजपूत आणि इतर 10 अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा व कायदेशीर कारवाई:
याप्रकरणी वरणगांव पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस गु.र.नं. 018/2025 अन्वये भारतीय दंड संहिता कलम 189(1), 189(2), 189(3), 189(4), 118(1), 299 तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत कलमे लागू करण्यात आली आहेत.
जखमी व पुढील तपास:
या घटनेत अंजनाबाई गौतम जोहरे, दुर्गा सुनील भालेराव, उत्तम बंडू जोहरे, अजय प्रकाश बोदडे, प्रकाश गौतम जोहरे, संजीवनी पुना बाच आणि आशिष भालेराव हे जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय, वरणगांव येथे उपचार सुरू आहेत.
सदर प्रकरणाचा पुढील तपास सपोनि जनार्दन खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सध्या परिसरात शांतता असून, पोलीस सतर्क आहेत.