“तुम्हाला मुलगी लागत होती, तर माझा हिरा का हिरावून घेतला?” असा सवाल करत मयत तरुणाच्या पत्नीने टाहो फोडला.
प्रकरणाचा तपशील
मयत तरुणाचे नाव मुकेश रमेश शिरसाठ (वय २६) असून चार वर्षांपूर्वी त्याने पूजा शिरसाठ हिच्यासोबत प्रेम विवाह केला होता. हे दोघे एकाच जातीचे असूनही पूजाच्या कुटुंबीयांना हा विवाह मान्य नव्हता. त्यांच्यात वारंवार वाद होत होते.
मुकेशची पत्नी पूजाने आरोप केला की, “माझ्या पतीच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे. आम्ही चार वर्षांपूर्वी लग्न केलं होतं. तेव्हापासूनच माझ्या पतीला वारंवार धमक्या दिल्या जात होत्या.”
“माझ्या पतीला जाणीवपूर्वक मारलं गेलं. माझे दोन छोटे मुलं आहेत. आता ती कुणाकडे दाद मागणार? माझा हिरा हिरावून घेतला,” असे सांगताना पूजाचे डोळे भरून आले.
प्राणघातक हल्ला
रविवारी सकाळी मुकेश दुकानात असताना पूजाचे काका सतीश केदार भाऊ प्रकाश सोनवणे, आणि इतर नातेवाईकांनी हल्ला केला. या हल्ल्यात कोयते आणि चॉपरचा वापर करण्यात आला. “तू पूजाशी पळून जाऊन लग्न केलंस, यापूर्वी सोडून दिलं होतं, पण आता तुझ्या कुटुंबाला संपवू,” अशी धमकी देत त्याच्यावर हल्ला करण्यात आला.
कुटुंबीयांचा आरोप
मुकेशच्या बहिणीने पोलिसांवरही गंभीर आरोप केला. “माझ्या भावाची मान कापून टाकली गेली, पण पोलिसांनी वेळेवर मदत केली नाही. त्यांनी अरेरावी केली. नितीन केदार नावाच्या अधिकाऱ्याने म्हटलं, ‘त्याला मारून टाका, मग आम्ही पाहू.’ आम्हाला न्याय मिळाला नाही, तर आम्ही पोलिस ठाण्यासमोर आत्मदहन करू,” असा इशारा दिला आहे.
“पोलिसांनी पैसे घेतले, परंतु न्याय मिळाला नाही. आमचा भाऊ परत आणा, अन्यथा आम्ही न्यायासाठी थेट लढा देऊ,”असेही कुटुंबीयांनी सांगितले.
माहेरच्यांचा राग
चार वर्षांपूर्वी पळून जाऊन लग्न केल्याचा राग पूजाच्या कुटुंबीयांना होता. पूजाचे आई-वडील आणि भाऊ जळगावातच, मुकेशच्या घरीपासून काही अंतरावर राहत होते. तरीही त्यांनी पुन्हा वारंवार धमक्या दिल्या होत्या.
आरोपींची नावे
या हल्ल्यात सहभागी आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
- – सतीश केदार
- – प्रकाश सोनवणे
- – सुरेश बनसोडे
- – बबलू बनसोडे
- – राहुल सोनवणे
- – पंकज सोनवणे
- – अश्विन सुरवाडे
- – विकी गांगले
- – बबल्या गांगले
याशिवाय दोन अनोळखी व्यक्तीदेखील होत्या.
पोलिसांचे कारवाईबाबत आश्वासन
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मात्र, कुटुंबीयांच्या आरोपांवर अजून कोणतीही ठोस प्रतिक्रिया दिलेली नाही.
न्यायाची मागणी
मुकेशच्या कुटुंबीयांनी व पत्नीने आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. “जर न्याय मिळाला नाही, तर आम्हाला न्यायासाठी वेगळे मार्ग निवडावे लागतील,”असे कुटुंबीयांनी सांगितले.
हे प्रकरण जळगाव जिल्ह्यातील जातीय वैमनस्य आणि कौटुंबिक संघर्षाचा अत्यंत गंभीर प्रकार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या प्रकरणावर आहे.