बातम्या

महाराष्ट्रात ५ डिसेंबरला शपथविधी; पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्याची शक्यता ?

मुंबई : महाराष्ट्र राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही अद्याप मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरत नाही. ५ डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा होणार असल्याची माहिती भाजप नेते, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवरुन दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर दिल्लीतील बैठकीत ग्रीन सिग्नल देण्यात आला होता, मात्र अद्याप कोणत्याही नावाची घोषणा हाय कमांडकडून करण्यात आलेली नाही. दिल्ली येथील हाय कमांडकडून महाराष्ट्रात पुन्हा एकदा धक्का तंत्र वापरलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदेच विराजमान होण्याची शक्यता खात्रीलायक सूत्रांकडून वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री कोण होणार अशी चर्चा राज्यभर रंगली असतानाच, पुन्हा एकदा शिंदे यांचे नाव चर्चेत आलं आहे.

एकनाथ शिंदेंच्या नावाचा विचार सुरू
महाराष्ट्रातल्या निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेल्या होत्या. अशात जनमताचा अनादर होऊ नये, असाही एक मतप्रवाह भाजपाच्या नेत्यांकडून व्यक्त होत आहे. विरोधकांनी ईव्हीएमचा मुद्दा तापवला आहे, अशातच मराठा आरक्षणाचा मुद्दा ही पुन्हा तापण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा दिल्ली दरबारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्याशिवाय आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेता या सगळ्याचाही गांभीर्याने विचार सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे.

मुख्यमंत्री पदावर मराठा चेहरा असावा
भाजपाला १३३ जागा मिळाल्यानंतर भाजपाचाच मुख्यमंत्री व्हावा, भाजपाचे शीर्षस्थ नेतृत्व असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपद जावं अशी भाजपतील आमदारांची आणि नेत्यांची मागणी आहे. देवेंद्र फडणवीस हे किंगमेकर असून त्यांचा प्रशासनातील अनुभव मोठा आहे, त्यामुळे ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री हवेत अशी अनेकांची इच्छा आहे.याचवेळी शिंदेसेनेतील आमदारही एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत, या मतावर ठाम आहेत. सामान्य जनतेतील अनेकांकडूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नावाला पुन्हा पसंती दिली जात आहे, तर काहींकडून भाजपला जास्त जागा मिळाल्याने पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावेत, अशाही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

मुख्यमंत्री पदावर मराठा चेहरा असावा यासाठी भाजपचे हाय कमांड गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली असून पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच विराजमान होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली गेली आहे.

भाजपकडून या नावाचाही विचार
मराठा फॅक्टर समोर आल्यास आशिष शेलार यांच्याही नावाचा विचार केला जाऊ शकतो, की पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर अंतिम शिक्कामोर्तब होतो, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!