नेमकं प्रकरण काय आहे?

तक्रारदार आणि त्यांच्या काकांची मस्कावद (ता. रावेर) येथे शेतजमीन असून, त्यांनी भूमी अभिलेख कार्यालयात दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी मोजणीसाठी अर्ज केला होता. यासाठी आवश्यक शासकीय शुल्कही त्यांनी भरले. त्यानंतर 18 फेब्रुवारी 2025 रोजी भूकरमापक राजेंद्र रमेश कुलकर्णी (वय 48, भूकरमापक, भूमी अभिलेख कार्यालय, रावेर, जि. जळगाव) यांनी शेतात येऊन मोजणी केली.

मोजणी दरम्यान कुलकर्णी यांनी 5500 रुपयांची लाच मागणी केली. तक्रारदाराने पैसे नसल्याचे सांगितल्यावर “पैसे देऊ शकत नसाल, तर चण्याचे (हरभरे) पिक द्या”, असे सांगत लाचेचा दुसरा पर्यायही दिला. मात्र, तक्रारदाराला पैसे किंवा हरभरे काहीही द्यायचे नसल्याने त्यांनी 4 मार्च 2025 रोजी ACB, जळगाव येथे तक्रार दाखल केली.

लाच मागणी पडताळणी आणि सापळा कारवाई

तक्रारीनंतर ACB ने 4 आणि 25 मार्च रोजी पंचासमक्ष लाच मागणीची पडताळणी केली. या वेळी भूकरमापक राजेंद्र कुलकर्णी यांनी प्रथम 5500, नंतर 5000 आणि अखेर 4000 रुपये लाचेची रक्कम निश्चित केली. तसेच, 4 मार्च रोजीच्या पडताळणीत रोख रक्कम नसेल, तर हरभऱ्याचे दाणे द्या, असेही सांगण्यात आले होते.

तक्रारदाराने ACBच्या मार्गदर्शनाखाली पैसे देण्याचे मान्य केले, आणि यानुसार 26 मार्च 2025 रोजी सापळा रचण्यात आला. आरोपी कुलकर्णी यांनी तक्रारदाराला निंभोरा येथे एका शेताजवळ बोलावून 4,000 रुपये स्वीकारले, तेव्हाच ACB पथकाने त्यांना रंगेहात पकडले.

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

भूकरमापक राजेंद्र रमेश कुलकर्णी यांच्यावर निंभोरा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून, सरकारी कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या लाचखोरीविरोधात नागरिकांनी तत्काळ ACB कडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सापळा कारवाई पथक:

✅ सापळा व पर्यवेक्षण अधिकारी:

श्री. योगेश ठाकूर (पोलीस उप अधीक्षक, ACB, जळगाव)

✅ मार्गदर्शन:

मा. श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (पोलीस अधीक्षक, ACB, नाशिक परिक्षेत्र)

✅ सापळा पथक:

सहाय्यक फौजदार सुरेश पाटील

पोकाॅ राकेश दुसाने

पोकाॅ अमोल सूर्यवंशी

सरकारी कर्मचाऱ्यांनी नागरिकांची कामे विनामोबदला करावीत. अन्यथा, लाच घेतल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे ACB ने स्पष्ट केले आहे.

 

Back to top button
error: Content is protected !!